TMC मध्ये मोठा भूकंप! २० खासदारांचे बंड, युसुफ पठाण यांच्यावर महुआ मोईत्रा भडकल्या; म्हणाल्या, “थोडी तरी शरम…”

Shabbir Vasta
3 Min Read

नवी दिल्ली:
पश्चिम बंगालच्या राजकारणातून आणि देशाच्या राजधानीतून अत्यंत धक्कादायक राजकीय वृत्त समोर येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) २८ लोकसभा खासदारांपैकी तब्बल २० खासदारांच्या एका मोठ्या गटाने बंडखोरी करत भाजप प्रणित ‘एनडीए’ (NDA) मध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. या बंडखोर खासदारांचा गट लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठिंब्याचे पत्र देणार आहे. या मोठ्या फुटीमुळे ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर अत्यंत मोठा धक्का बसला आहे.
माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्यावर महुआ मोईत्रांचा थेट हल्ला
विशेष म्हणजे या बंडखोर २० खासदारांच्या गटामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि बेहरामपूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार युसुफ पठाण यांचाही समावेश आहे. युसुफ पठाण यांनी बंडखोर छावणीची वाट धरल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा अत्यंत संतप्त झाल्या आहेत. मोईत्रा यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत युसुफ पठाण यांच्यावर बोचरी टीका केली असून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
महुआ मोईत्रा यांनी युसुफ पठाण यांना फटकारताना लिहिले:
“युसुफ पठाण, तुम्ही अमित शहांच्या एका हाकेवर दिल्लीला पळत आहात. थोडी तरी हिंमत ठेवा. तुम्ही देशासाठी क्रिकेट खेळलेले आहात. आपल्या जिल्ह्याने (बेहरामपूर) तुमच्यावर विश्वास ठेवून मोठ्या मताधिक्याने तुम्हाला निवडून दिले आहे. थोडी तरी शरम बाळगा. तुम्हाला पाठीचा कणा आहे की नाही?”

“राजीनामा द्या आणि भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवा”
महुआ मोईत्रा एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी एनडीएच्या वाटेवर असलेल्या इतर सर्वच बंडखोर खासदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत थेट आव्हान दिले आहे.
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जे खासदार तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर आणि चिन्हावर जिंकून आले, त्यांना जनतेने दिलेली मतं ही ‘एनडीए’साठी नव्हती. सर्व स्वार्थी आणि गद्दार लोक आता भाजपमध्ये सामील होत आहेत. जर तुमच्यात हिंमत असेल, तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवून जिंकून या. मग बघू तुम्ही किती मोठे हिरो आहात!”
काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वात बंड?
तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी दिल्लीत या २० खासदारांचा गट एनडीएला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. पक्षांतर बंदी कायद्याच्या (Anti-Defection Law) कायदेशीर कचाट्यातून वाचण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या एकूण २८ खासदारांपैकी दोन तृतीयांश (२/३) म्हणजेच १९ पेक्षा जास्त खासदारांची गरज होती. बंडखोरांचा आकडा २० वर गेल्यामुळे हा गट तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.
सध्या दिल्लीतील या वेगवान राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, यावर आता भाजप आणि बंडखोर युसुफ पठाण काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *