रत्नागिरी (१५ सप्टेंबर):
जलप्रदूषण कमी करणे आणि प्लास्टिक मुक्त सागर किनारा यासाठी कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे वतीने मांडवी समुद्र किनारा येथे निर्माल्य संकलनास सहकार्य करण्यात आले. वाढते सागरी प्रदूषण ही गंभीर समस्या असून जगभरातील अनेक देशांमध्ये सागरी सजीव सृष्टी तसेच पर्यटन व्यवसायास यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपले पर्यावरण ही आपली जबाबदारी आहे या भावनेतून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कार्यरत असतात.
गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी आणलेले निर्माल्य तसेच प्लास्टिक समुद्रात न टाकता ते संकलित व वर्गीकृत करण्यात आले. विद्यमान वर्षी नगर परिषद रत्नागिरी यांचे अभियानात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील ५० विद्यार्थांनी या निर्माल्य संकलन कार्यात सहभाग घेतला. सोबत कार्यक्रम समन्वयक डॉ. दानिश गनी, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. सचिन सनगरे उपस्थित होते.