रत्नागिरी:
कोकणातील लाखो वीज ग्राहकांना काल MSEDCL (महावितरण) ठाणे शाखेकडून आलेल्या एका धमकीवजा मेसेजमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “४८ तासांत स्मार्ट मीटर बसवू,” अशा आशयाचा हा मेसेज आल्यानंतर, “आपण लोकशाहीत राहतो की हुकूमशाहीत?” असा संतप्त सवाल कोकणातील सामान्य जनतेने उपस्थित केला आहे. या प्रकारानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाने आक्रमक भूमिका घेत महावितरण प्रशासनाला चांगलाच सज्जड दम भरला आहे.
शिवसेना UBT महावितरण कार्यालयावर धडकली
ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत शिवसेना UBT चे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. अधिकाऱ्यांना जाब विचारत जनतेवर कोणत्याही प्रकारची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, शशी बारगोडे, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला शहर संघटक सेजल बोराटे, माजी नगरसेविका फौजिया मुजावर यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियम काय सांगतो? (महत्त्वाची पार्श्वभूमी)
ग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि प्रशासनाचे नियम खालीलप्रमाणे आहेत:
केंद्राचा नियम: १ एप्रिल २०२६ पासून प्रीपेड मीटरची सक्ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. ग्राहकाच्या लेखी संमतीशिवाय त्याचे मीटर प्रीपेड करता येणार नाही.
MSEDCL ची भूमिका: महावितरणचे संचालक सचिन तळेवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, “नवीन स्मार्ट मीटर हे फक्त पोस्टपेड (बिल पद्धतीचे) राहतील, प्रीपेड नाहीत.”
मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांचे आदेश: सामान्य ग्राहकांवर प्रीपेडची सक्ती करू नका. तसेच, नागरिकांचे घर बंद असताना त्यांच्या पाठीमागे जबरदस्तीने मीटर बदलण्याची कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
आता पुढे काय?
शिवसेना UBT च्या या आक्रमक पवित्र्यानंतर आणि जनतेच्या संतापानंतर महावितरण प्रशासन बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणात सध्या सुरू असलेली स्मार्ट मीटरची सक्ती आणि घाई गडबड थांबण्याची चिन्हे आहेत.
वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची सुचना:
१. घाबरू नका: महावितरणच्या ४८ तासांच्या मुदतीच्या कोणत्याही मेसेजला किंवा धमकीला घाबरून जाण्याची गरज नाही.
२. लेखी अर्ज द्या: जर तुम्हाला प्रीपेड मीटर नको असेल, तर महावितरणच्या स्थानिक कार्यालयात लेखी अर्ज सादर करा.
३. तक्रार नोंदवा: तुमच्या संमतीशिवाय जबरदस्तीने मीटर बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित १९१२ (1912) या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधा.
कोकणात स्मार्ट मीटरची जबरदस्ती? ‘त्या’ धमकीवजा मेसेजमुळे खळबळ; शिवसेना UBT चा MSEDCL ला सज्जड दम
Leave a Comment
