रत्नागिरी सज्ज! शिमगोत्सवासाठी पालखी मार्गांची युद्धपातळीवर पाहणी; नगराध्यक्षांचा ‘अ‍ॅक्शन मोड’

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी:  कोकणचा प्राण आणि रत्नागिरीकरांच्या अस्मितेचा सोहळा म्हणजे ‘शिमगोत्सव’! अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणानिमित्त शहरात चैतन्याचे वातावरण आहे. आपल्या लाडक्या ग्रामदैवताच्या पालखी सोहळ्यात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी स्वतः मैदानात उतरून पालखी मार्गांची सविस्तर पाहणी केली.

श्री देव भैरीच्या स्वागतासाठी पालिका ‘कंबर कसली’!

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी आणि जोगेश्वरी यांच्या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या उत्सवात मुख्य पालखीची ग्रामप्रदक्षिणा आणि आसपासच्या गावांतील पालख्यांची होणारी भेट हा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा असतो. हा सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी नगरपालिकेने आता कंबर कसली आहे.

      श्री देव कालभैरव मार्ग (खालची आळी) येथील रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामाची नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी केली. उत्सवा दरम्यान शहरात होणारी गर्दी लक्षात घेता, रस्ते चकाचक ठेवण्यासोबतच पथदीपांची (Street Lights) व्यवस्था चोख ठेवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.उत्सवापूर्वी सर्व मार्ग सुस्थितीत हवेत, भाविकांच्या सुविधेमध्ये कोणतीही कसर राहता कामा नये, असे स्पष्ट आदेश सौ. सुर्वे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.

   “शिमगोत्सव हा कोकणच्या संस्कृतीचा कणा आहे. हजारो भाविकांच्या श्रद्धेचा हा विषय असल्याने नगरपालिका प्रशासन पूर्ण ताकदीने आणि नियोजनाने काम करत आहे.” असे नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वेने सांगितले.
     या पाहणी दौऱ्यावेळी नगराध्यक्षांसोबत नगरसेवक राजेश तोडणकर आणि पालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. एकंदरीतच, रत्नागिरी नगरपालिका आता सज्ज झाली असून, शहर आपल्या ग्रामदैवताच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आतुर झाले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *