रत्नागिरी सज्ज! श्री देव भैरींच्या पालखी मार्गाची नगराध्यक्षांकडून ‘ऑन ग्राऊंड’ पाहणी

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी:
कोकणचा लाडका सण म्हणजेच ‘शिमगोत्सव’  आला आहे. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी यांच्या पालखी सोहळ्यासाठी अवघी नगरी नटून थटून तयार होत असतानाच, प्रशासकीय पातळीवरही आता हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उत्सवात कोणतीही उणीव भासू नये यासाठी नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पालखी मार्गाची पाहणी केली.

‘लाईट’ अप रत्नागिरी: पालखी मार्ग उजळणार!

ग्रामदैवताची पालखी आणि धुळवडीचा उत्साह ज्या मार्गावरून ओसंडून वाहणार आहे, त्या संपूर्ण मार्गावरील विद्युत व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. नगराध्यक्षांनी स्वतः संपूर्ण पालखी मार्गावर फिरून पथदीपांची (Street Lights) पाहणी केली.पाहणी दरम्यान काही ठिकाणी पथदीप बंद असल्याचे समोर येताच, सौ. सुर्वे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत ‘तातडीने दुरुस्ती करा’ असे सक्त आदेश दिले आहेत. रात्रीच्या वेळी पालखी सोहळ्यात भाविकांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण परिसर प्रकाशमय असावा, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
     या मोहिमेदरम्यान नगराध्यक्षांसोबत नगरसेवक अभी दुडे, श्री. प्रशांत सुर्वे तसेच युवासेनेचे पदाधिकारी आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. केवळ वीजच नाही, तर रस्ते आणि इतर सोयीसुविधांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
      रत्नागिरीकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव भैरींचा उत्सव हा आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. हा सोहळा निर्विघ्न, सुरक्षित आणि मंगलमय वातावरणात पार पाडण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.
     ग्रामदैवताच्या स्वागतासाठी रत्नागिरीकर सज्ज झाले असून, आता शहराचे रस्तेही लखलखत्या दिव्यांनी उजळून निघणार आहेत. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘होळी रे होळी’च्या आवाजात रत्नागिरी पुन्हा एकदा न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाली आहे!

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *