जालना:
अन्यायाविरुद्ध लढणारा एक झुंजार नेता आणि मुस्लिम ओबीसी चळवळीचे आधारस्तंभ, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांचे रविवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ मुस्लिम समाजच नव्हे, तर राज्यातील संपूर्ण सामाजिक चळवळीवर शोककळा पसरली असून एक प्रगल्भ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
४० वर्षांचा संघर्षमय प्रवास
गेल्या चार दशकांपासून शब्बीर भाई अन्सारी यांनी पददलित, वंचित आणि विशेषतः मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले. “हक्क मागून मिळत नसतील तर ते खेचून घ्यावे लागतात,” हा विचार त्यांनी संघटनेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मुस्लिम ओबीसी बांधवांना संघटित करून त्यांना सामाजिक न्यायाची दिशा दाखवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
रत्नागिरीतून भावपूर्ण श्रद्धांजली
हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनाचे वृत्त समजताच रत्नागिरी जिल्ह्यातही हळहळ व्यक्त करण्यात आली. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांच्यासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “शब्बीर भाईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, मात्र त्यांनी दिलेला लढ्याचा विचार आम्ही पुढे नेऊ,” असा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
परिवार आणि सामाजिक वारसा
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सहा मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे. जालना येथील त्यांच्या निवासस्थानी आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले जात आहे. एका निस्पृह आणि तत्त्वनिष्ठ नेत्याला गमावल्याची भावना आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दाटून आली आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या लढ्यातील हा ‘दिपस्तंभ’ आता विझला असला, तरी त्यांनी पेटवलेली संघर्षाची मशाल सदैव धगधगत राहील.
