राज्यात अखेर मान्सूनचे दमदार आगमन; मुंबईसह विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा

Shabbir Vasta
1 Min Read

मुंबई:
गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मान्सूनने अखेर राज्यात दमदार हजेरी लावली आहे. राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून, सर्वदूर पावसाने जोर धरला आहे. ही बातमी विशेषतः शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ ते २८ जून या कालावधीत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून, ‘धो-धो’ पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, पुढील ३ तासांत काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. विशेषतः कुर्ला, किंग सर्कल आणि सायन परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्ते जलमय झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

मान्सून आता संपूर्ण राज्यभर पसरला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तो अरबी समुद्राकडून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *