रत्नागिरी, दि. ३: रत्नागिरीच्या दळणवळण आणि सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) संपन्न होणार आहे.रविवार, ५ जुलै, सकाळी ११ वाजता,हॉटेल सावंत पॅलेस हॉल’, टी.आर.पी. परिसर, रत्नागिरीत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. त्यांच्यासोबत गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंदे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच, या कार्यक्रमासाठी खासदार नारायण राणे, सुनील तटकरे, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव आणि किरण सामंत यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, MADC चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, कमांडिंग ऑफिसर कुणाल सी. नाईक, जिल्हाधिकारी मनूज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि पोलीस अधीक्षक नितीन बागाटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सामंजस्य करारामुळे केवळ नागरी विमान वाहतुकीलाच चालना मिळणार नाही, तर किनारपट्टीची सुरक्षा आणि स्थानिक पर्यटनालाही मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म.वि.वि. कंपनी मर्यादितचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी सर्व संबंधित नागरिकांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
