रत्नागिरी:
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने ९४ टक्के स्ट्राईक रेट गाठत विरोधकांचे अक्षरशः धूळदाण उडवले आहे. मात्र, या विजयाचा गुलाल उधळत असतानाच पालकमंत्री उदय सामंत यांनी पक्षांतर्गत कुरघोडी करणाऱ्यांना आणि ‘छुपी मैत्री’ जपणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
‘…तर याद राखा!’ – सामंतांचा कडक इशारा
शहरातील जयेश मंगल पार्क येथे पार पडलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उदय सामंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट करून तुम्हाला निवडून आणले, त्यांना विसरू नका. पक्षात राहून बंडखोरांशी मैत्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा लोकांमुळेच संगमेश्वर तालुक्यात १०० टक्के यशाची संधी हुकली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
विकास निधी हा ‘शिवसेनेचा’!
विजेत्या लोकप्रतिनिधींचे कान टोचताना सामंत यांनी स्पष्ट केले की, मिळणारा विकास निधी हा कोणा एका व्यक्तीचा नसून तो ‘शिवसेनेचा’ आहे. यापुढे प्रत्येक काम करताना पक्षाला केंद्रस्थानी ठेवूनच निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा संघटनात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे संकेत त्यांनी दिले.
रत्नागिरीत जरी शिवसेनेने बाजी मारली असली, तरी पक्षशिस्त मोडणाऱ्यांसाठी आता ‘नो कॉम्प्रमाईज’ धोरण लागू झाले आहे!
“कार्यकर्त्यांच्या कष्टावर निवडून आलात, विसरलात तर याद राखा!” : सामंतांनी टोचले लोकप्रतिनिधींचे कान
Leave a Comment
