भारताने कठीण काळात इराणला साथ द्यायला हवी होती
मुंबई:
शिवतीर्थावर पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भव्य गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. इराण-इस्रायल संघर्ष आणि देशातील वाढती महागाई यावर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
इराणने नेहमीच साथ दिली, पण आपण…
भाषणाच्या सुरुवातीलाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, “ज्या देशाने काश्मीर प्रश्नावर भारताला नेहमीच पाठिंबा दिला, जो देश आपल्याला रुपयांमध्ये तेल देतो, त्या इराणवर आज संकट असताना आपण त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. मात्र, खामेनी यांच्या निधनानंतर भारताने श्रद्धांजली वाहण्यास उशीर केला, हे दुर्दैवी आहे.”
गॅस टंचाई आणि सामान्यांची ‘धडकधूक’
देशातील भीषण परिस्थितीवर बोट ठेवत त्यांनी एलपीजी गॅसच्या टंचाईवर चिंता व्यक्त केली. “आज देशात भीतीचे वातावरण आहे. सामान्य माणूस गॅसवर आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी पंतप्रधानांकडून सुटल्या आहेत, ज्याचा फटका भविष्यात देशाला सोसावा लागेल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
इंस्टाग्रामच्या मोहजालातून बाहेर या!
कार्यकर्त्यांना आणि तरुणांना साद घालताना राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या अतिवापरावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले:
“आज संपूर्ण देशाला करमणुकीत गुंतवून ठेवले आहे. आयपीएल, चित्रपट आणि ‘रिलबाजी’ यामध्ये तरुण पिढी अडकली आहे. हे एक प्रकारे डिझाइन केले गेले आहे जेणेकरून तुम्ही सरकारला प्रश्न विचारू नये. माझी नम्र विनंती आहे, आधी या मोबाईलच्या इंस्टाग्राममधून बाहेर पडा आणि वास्तव समजून घ्या!”
भारताने कठीण काळात इराणला साथ द्यायला हवी होती. महागाईचा वार करताना एलपीजी तुटवड्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. तरुणांना सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले.
इराण-इस्रायल युद्धावरून राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात; गुढीपाडवा मेळाव्यात ‘राज’गर्जना!
Leave a Comment
