राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार

Shabbir Vasta
2 Min Read

मुंबई:   राज्यात दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भ उन्हाच्या कडाक्याने होरपळत असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावून नागरिकांना दिलासा दिला आहे. काल मुंबईसह पुणे, कोकणात पावसाच्या सरी कोसळल्या. आज देखील कोकणासह सातारा, सांगली जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
      हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. दुसरीकडे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांचा कडकडाट आणि अचानक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
      उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर काही भागांत उन्हाचा चटका कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यभरात दुहेरी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. भारतीय हवामान विभागाने यंदा केरळमध्ये २६ मेपासून मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनचे आगमन आधीच झाले असल्याने यंदा मान्सून वेळेआधीच सक्रिय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस २ ते ५ जूनदरम्यान दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत असून, येत्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *