डोंगर मोहल्ला परिसर प्रकाश व्यवस्थेने उजळला; हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम!
राजापूर (प्रतिनिधी):
हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची परंपरा जपणारा राजापूर येथील हजरत शेख सुलेमान शहाबाबांचा वार्षिक ऊरुस यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या पवित्र सोहळ्याला आमदार किरण सामंत यांनी विशेष उपस्थिती लावून बाबांच्या चरणी दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांना ऊरुसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाविकांशी संवाद साधताना आमदार किरण सामंत म्हणाले, “हजरत शेख सुलेमान शहा बाबांचा ऊरुस हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक जिवंत उदाहरण आहे. या पवित्र ठिकाणी सर्व धर्मीय नागरिक मोठ्या श्रद्धेने एकत्र येतात. अशा धार्मिक आणि सामाजिक परंपराच समाजामध्ये एकोपा, प्रेम आणि बंधुभाव वाढवण्याचे खरे काम करत असतात.”
डोंगर मोहल्ला परिसरातील विकासकामांना चालना
डोंगर मोहल्ला परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित मागण्या आणि आवश्यक सुविधांचा विचार करून आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून या भागातील विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. विशेषतः ऊरुसाच्या पार्श्वभूमीवर आमदार सामंत यांच्या माध्यमातून परिसरात अत्याधुनिक प्रकाश व्यवस्थेची (Street Lights) सोय करण्यात आली. यामुळे संपूर्ण डोंगर मोहल्ला परिसर उजळून निघाला असून, रात्रीच्या वेळी येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर झाली आहे. या तात्कालिक आणि कायमस्वरूपी सुविधेबद्दल स्थानिक नागरिकांनी व उरुस कमिटीने तीव्र समाधान व्यक्त केले.
पुढे बोलताना आमदार सामंत म्हणाले, “राजापूर मतदारसंघातील प्रत्येक भागातील नागरिकांना पायाभूत आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. धार्मिक आणि सामाजिक स्थळांचा विकास करताना समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा माझा संकल्प आहे.”
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि मान्यवरांची उपस्थिती
ऊरुसाच्या निमित्ताने डोंगर मोहल्ला परिसरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे नेटके आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण राजापूर तालुक्यातून आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावत बाबांचे दर्शन घेतले. हा संपूर्ण सोहळा अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी शिवसेना नेते रवींद्र नागरेकर, राजू कुरूप, मुन्ना खामकर, प्रसन्न शेट्ये, अशपाक हाजू, बाबा भिंगाडे, इमरान डोंगरकर, यासीन तांडेल, जुबेदा मस्तान, सलीम मस्तान, मुसा मस्तान, निसार बाबाजी, रमेश सूत, प्रसाद मोहरकर, अरविंद लाजेकर, रुपेश कांबळे यांच्यासह स्थानिक नागरिक, उरुस कमिटीचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
