संगमेश्वर:
निसर्गाच्या सानिध्यात, पावसाच्या रिमझिम सरी आणि चिखलाने माखलेली शेती… असा काहीसा आनंददायी अनुभव नुकताच संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) विद्यार्थ्यांनी घेतला. बुरंबी येथील ॲग्रो फार्मवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भात लावणीचा थरार अनुभवला.
यावेळी संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. आधुनिक शेतीमध्ये यंत्रणेचा वापर कसा करावा, विविध प्रकारच्या भात बियाण्यांची निवड, तसेच कमी आणि जास्त पावसाच्या परिस्थितीत कोणती पिके घ्यावीत, याचे सखोल मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. केवळ तांत्रिक माहिती न देता, प्रत्यक्ष शेतात उतरून त्यांनी भात लावणीचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.
या शैक्षणिक आणि प्रेरणादायी उपक्रमात एनएसएस विभागाचे प्रमुख प्रा. दीपक भोसले, युयुत्सु आरत्ये यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन मातीशी नाळ जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
