रत्नागिरी (प्रतिनिधी):
राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्यावर सक्तीने लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात गुरुवारी रत्नागिरीत शिक्षकांनी एल्गार पुकारला. ‘रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती’च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या मोर्चात मंडणगड ते राजापूरपर्यंतच्या हजारो शिक्षक-शिक्षिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गुरुवारी सकाळी माळनाका येथून या मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करत दुपारी बारा वाजता हा विराट मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा दिवसभर बंद होत्या.
प्रमुख मागण्या:
यावेळी शिष्टमंडळाने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्यांचा पुनरुच्चार केला:
१. मतदार यादी पुनरीक्षण (SIR) आणि बीएलओ (BLO) सारखी अशैक्षणिक कामे शिक्षकांवर लादणे त्वरित बंद करावे.
२. सेवाज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांना तातडीने पदोन्नती मिळावी आणि पदोन्नतीतील अन्यायकारक अटी रद्द कराव्यात.
३. ज्येष्ठ शिक्षकांसाठी टीईटी (TET) परीक्षेची अट रद्द करून त्यांना सेवा संरक्षण मिळावे.
४. संच मान्यतेचे जाचक धोरण त्वरित मागे घेण्यात यावे.
५. रिक्त पदे तातडीने भरून जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करावी.
शिक्षकांचे हे आंदोलन आपल्या न्याय्य हक्कांच्या आणि शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या हेतूने असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेबद्दल ‘रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती’ने सर्व शिक्षक बांधव व भगिनींचे आभार मानले आहेत.
शिक्षकांवर लादलेल्या अशैक्षणिक कामांचा निषेध; रत्नागिरीत शिक्षकांचा जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा
Leave a Comment
