रत्नागिरी: राजकारणाच्या आखाड्यात अनेक विजय पाहिले जातात, पण जेव्हा संघर्षाला जिद्दीची जोड मिळते, तेव्हा तो विजय सुवर्णक्षरांनी लिहिला जातो. भाटये पंचायत समिती गणातून ऍड. अर्चना तुषार साळवी यांनी असाच दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला आहे. पहिल्याच निवडणुकीत, एका गृहिणीपासून लोकप्रतिनिधी पर्यंतचा हा प्रवास खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला आहे.
ढोल-ताशांच्या गजरात पतीचा जल्लोष!
या विजयाचा सर्वात खास क्षण ठरला तो म्हणजे युवासेनेचे जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांचा आनंद. आपल्या पत्नीच्या विजयाची घोषणा होताच, साळवी यांनी स्वतः ढोल गळ्यात अडकवून तो वाजवत गुलालाची उधळण केली. पत्नीच्या यशात सहभागी होणाऱ्या एका कार्यकर्त्याचा आणि अभिमान वाटणाऱ्या पतीचा हा जोश पाहून उपस्थितही भारावून गेले.
ऍड. अर्चना साळवी यांनी तब्बल ३ हजार ६७ मताधिक्याने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात पंचायत समिती गणात सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवारांपैकी त्या एक ठरल्या आहेत. पेशाने वकील असलेल्या अर्चना साळवी यांनी आपल्या संयमी आणि अभ्यासू वृत्तीने मतदारांची मने जिंकली. या निवडणुकीत त्यांच्यासोबतच ज्येष्ठ नेते नेताजी पाटील आणि नंदा मुरकर यांनीही विजयाचा गुलाल उधळला आहे.
पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची ताकद
या विजयामागे पालकमंत्री उदय सामंत यांचा भक्कम आशीर्वाद आणि शिवसेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांची अहोरात्र घेतलेली मेहनत उभी होती. भाटये गणात आता विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास या विजयानंतर व्यक्त केला जात आहे.
