चिपळूण :
येथील अतिथी सभागृहात शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा (उत्तर) शिवसेना बीएलए (BLA) पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली. त्यावेळी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला.
पक्षाची खरी ताकद ही बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. गावखेड्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका आणि शासनाचे लोककल्याणकारी निर्णय घराघरांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. प्रत्येक गरजू नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आपण राजकारणापेक्षा ‘विकासकारणावर’ जास्त भर देतो. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा आपल्या भागातील विकासकामे कशी वेगाने पूर्ण होतील, याकडे लक्ष द्या. जनतेचा विकास हेच आपले मुख्य ध्येय असायला हवे याबाबत ना. उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीला माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, माजी आमदार श्री. संजय कदम, लोकसभा संपर्कप्रमुख श्री. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, जिल्हाप्रमुख श्री. राहुल पंडित, श्री. राजेश बेंडल, नगराध्यक्ष श्री. उमेश सपकाळ यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
